मुंबई - (raj and uddhav alliance)शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार अशा अनेकदा वावड्या उठत असतात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित यावे असेही तमाम महाराष्ट्रीयांना वाटते. मात्र महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता हे दोन्ही भाऊ एकत्रित आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा सकारात्मक बदल घडेल, असे वाटत नाही, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
लोन मिळत नाही तर येथे भेट द्या
महाराष्ट्र हित डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंसोबत काम करेन, असे राज ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले आहे. अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही भूमिका मांडली असावी, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरे यांनी ही भूमिका मांडली तर उद्धव ठाकरे यांनी अटी आणि शर्ती घातल्या आहेत. यायचं असेल तर अटी आणि शर्ती मान्य असतील तर सोबत ये असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. याचा अर्थ एकत्र आलो तरी हे एकत्रिकरण सशर्त असेल असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
विधानसभा निवडणूक 2024च्या निकालाचा विचार करता मनसेला एकही आमदार निवडून आणता आलेला नाही तर दुसरीकडे शिउबाठालाही मोठी कामगिरी करता आलेली नाही. या निडवणुकीत महायुतीची सरशी झाली, मात्र भाजपाचा दबदबा राहिला. त्यातच आता मनसेने हिंदी सक्ती आणि परप्रांतीय या मुद्द्यांवर आंदोलन सुरू केले आहे. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही भाजपाची राजकीय रणनीती असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे बोलले गेले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या खेळीमागे काही तरी वेगळा डाव असल्याचे शिउबाठाच्या नेत्यांना संशय आहे, असे म्हटले जात आहे.
'आजचा भाजपा हा महाराष्ट्राचा शत्रू आहे. त्याच शत्रूसोबत आणि एसंशिंसोबत राज ठाकरे सध्या आम्हाला दिसून येत आहेत. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या शक्तींसोबत राहायचे नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. राज ठाकरेंनीही यावर विचार करायला हवा. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर आम्ही सकारात्मक पद्धतीने पाहतोय, असे खासदार संजय राऊत म्हणाले. इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाबाबत अनेकदा भूमिका मांडल्या, मात्र या भूमिका बदलत असल्याचा फटका मनसेला बसत असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. राज ठाकरे यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी युतीचा हात पुढे केला म्हणून उद्धव ठाकरे लगेचच हात पुढे करतील असे वाटत नाही. यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र एक पाऊल मागे कोण घेणार आणि एक पाऊल पुढे कोण टाकणार, हा प्रश्नच आहे, अशी चर्चा जनतेमध्ये रंगली आहे. त्याचबरोबर सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेला मतांचा विचार कोणता पक्ष करतो, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे राजकीय पोळी भाजण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपा त्याचा फटका बसेल असे वाटत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.
.png)
.png)
0 Comments